मांजरीत जलपर्णी वाढल्याने होतोय नागरिकांना डासांचा त्रास   

पुणे : शहराच्या हद्दीतील नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये जलपर्णी दरवर्षी साठली जात आहे. त्यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र त्यानंतरही पूर्णपणे जलपर्णी नष्ट करण्यात पालिकेला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. मांजरी गावातील मुळा- नदीत पात्रात जलपर्णी साठल्याने नागिकांना त्रास सहन करावा लाहत आहे. ही जलपर्णी खराडीतून पुढे ढकलण्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च केले होते. आता पुन्हा हीच जलपर्णी मांजरी गावातून पुढे ढकलण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे जलपर्णीसोबत आर्थिक फायद्याचा प्रवाह वाहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 
खराडीत नदीपात्रातील जलपर्णी वाढल्यामुळे नागरिक चांगलेच त्रासले होते. जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे डासांचे थवेच्या थवे हवेत उडत असून त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मांजरी गावामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठली असल्याने जलपर्णीचा खेळ सुरु आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने तत्काळ जलपर्णी काढण्याची मागणी मांजरी ग्रामस्थांनी पुणे पालिकेकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मांजरीतील नागरिकांनी पालिकेच्या विरोधात आंदोलन देखिल केले होते. त्यावेळी जलपर्णी काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
 
खराडीत नदीवर पुलाचा बांधकाम तसेच जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍यामुळे जलपर्णी सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात साठली होती. जलपर्णी काढण्याच्या मागणीसाठी खराडीतील नागरिकांनी मागणी केली होती. मुंढवा-केशवनगर, खराडी भागातून पुढे ढकललेली जलपर्णी पुढे ढकलली जाते.
 
खराडीतील जलपर्णी काढून ती नष्ट करण्यात यावी. केवळ पाण्यातून काढून पुन्हा पुढे ढकलण्यात येऊ नये, अशी मागणी सातत्याने केली जाते. परंतु एका ठिकाणी काढलेली जलपर्णी काढून घेवून ती पुढे पाण्यात ढकलली जाते. त्यामुळे आता याचा त्रास मांजरीतील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पालिकेच्या हद्दीत मांजरी गावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या गावाच्या हद्दीतील जलपर्णी काढण्याचा खर्च हा पालिकेलाचा करावा लागणार आहे.
 
मांजरीत जलपर्णी एखाद्या शेतातील पिकांसारखी सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झालेली आहे. पर्यायाने गावठाण, मांजराईनगर परिसरामधील माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधी नगर, सटवाई नगर, ११६ घरकुल, ७२ घरकुल या झोपडपट्टी भागांमधील नागरिक डासांमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीकिनारी असणार्‍या या झोपडपट्टी भागामध्ये तातडीने औषध फवारणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
 
मांजरीमध्ये  दरवर्षी नदीपात्रात जलपर्णी साठते. यामुळे मोठ्या प्रमाणात डासाची उत्पत्ती होऊन नागरिकांना त्रास होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जलपर्णी काढण्याच्या मागणीसाठी पालिकेच्या विरोधाकत ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. जलसपर्णी तत्काळ काढली जाईल असे आश्वासन पालिकेने दिले होते. आता पुन्हा जलपर्णी साठली आहे. त्यामुळे ती तात्काळ काढण्यात यावी, आम्हाला आंदोलन करण्याची वेळ परत आणू नये.
 
 - राजेंद्र गोविंद साळवे,अध्यक्ष, अखिल मांजराई नगर नागरिक कृती समिती मांजरी. 
 
कल्याणी नगर भागातील नदी पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठली आहे. ती पुढे ढकलली जात आहे. हीच जलपर्णी पुढे जावून साठली आहे. मांजरी गावातील जलपर्णी काढून घेतली जाईल.  त्यामुळे मांजरी ग्रामस्थांनी काळजी करु नये. नदीपात्रातील जलपर्णी पुढे न ढकलता बाहेर काढण्यासाठी ज्याठिकाणी शक्य आहे, त्याठिकाणी बाहेर काढली जाते. काही पर्याय नसल्याने ती पाण्याच्या प्रवाहात पुढे ढकलावी लागते.
 
- मंगेश दिघे, पर्यावरण संवर्धन अधिकारी, पुणे महानगरपालिका.

Related Articles